Ticker

6/recent/ticker-posts

सरसेनापती हंबीरराव मोहिते व लढाया


सरसेनापतीपदी निवड



आदिलशाही सरदार बहलोलखान याच्यासोबत लढाईत सेनापती प्रतापराव गुजर पडले . प्रतापराव पडल्याची वार्ता कळताच प्रतापरावांच्या फौजेत असलेल्या हंबीरराव मोहिते यांनी सर्व सैनिकांत हिम्मत निर्माण करून , बहलोलखान तर आक्रमण करून त्याच्या सैन्याची दाणादाण उडवून त्यांस विजापूरपर्यंत पिटाळले. 


बह्लोलखानाविरुद्ध पराक्रमाने महाराजांना हंबीररावांमध्ये शहाणा,सबुरीचा सेनानी दिसला . चिपळूण जवळच्या श्रीक्षेत्र परशुराम येथे या सेनानीस महाराजांनी आपला सेनापती म्हणून निवडले . सभासद म्हणतो ,’प्रतापराव पडले हि खबर राजीयांनी ऐकून बहुत कष्टी जाले ,सरनोबत कोण करावा? अशी तजवीज करून ,आपण स्वस्थ लष्करात येउन ,लष्कर घेऊन कोकणांत चिपळूण जागा परशुरामाचे क्षेत्र आहे, तेथें येउन राहिले . मग लष्करची पाहणी करून लहान थोर लष्करास व पायदळ लोकांस खजिना फोडून वाटणी केली, आणि सरनोबतीस माणूस पाहता हंसाजी मोहिते म्हणून पागेमध्ये जुमला होता,बारा शहाणा , मर्दना ,सबुरीचा,चौकस,शिपाई मोठा धारकरी पाहून त्यास ‘ हंबीरराव ‘ नाव किताबती देऊन सरनोबती सांगितली . कुल लष्कराचा गहा करून हंबीरराव यांचे ताबीज दिधले . 

बहादूरखान , दिलेरखानादींना नजरेत धरले नाही. 


छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या फौजांनी दोन वर्ष मोघल व आदिलशाही भागातून मोठी लूट मारून आणली . या कालातील हंबीररावांची कामगिरी वर्णन करताना सभासद म्हणतो ,’राजीयांनी आपले लष्करास हुकुम करून हंबीरराव सरनोबत फौज घेऊन मोघलाईत शिरले . खानदेश,बागलाण,गुजराथ,अहमदाबाद,बुऱ्हानपूर,वर्हाड,माहूर मारून खंडणी करून जप्त केला . मालमत्ता अगणित जमा करून चालिले . तो बहादूरखान यांनी कुल जमाव घेऊन हंबीररायाचे पाठीवर चालून आले . राजीयाची फौज तोलदार गाठली. मोघल बहुत धास्तीने घाबरा होऊन सात-आठ गावांचे अंतराने चालीला. दिलेरखान उतावळा होऊन फौजेशी गाठ घातली. हंबीरराव यांनी नजरेत धरला नाही. तोलदारीने मत्ता घेऊन आपले देशास आले . मालमत्ता राजीयास दिली . 


व्यंकोजीराजांवर विजय 

कर्नाटक मोहिमेवर असताना महाराजांनी व्यंकोजीराजाकडे कर्नाटकातील शहाजीराजांच्या जहागीराचा अर्धा वाटा मागितला पण वाटा न देताच त्यांनी हंबीररावांच्या सैन्यावर आक्रमण केले . व्यंकोजीराजांकडे ४००० घोडदल व १०००० पायदळ होते.तर हंबीररावांच्या कडे ६००० घोडदल व ६००० पायदळ होते . दोन्ही सैन्यात जोरदार लढाई होऊन हंबीररावांच्या सेनेचा पराभव झाला . विजय मिळाल्यामुळे व्यंकोजीराजे व त्यांचे सैन्य आराम करू लागले . याप्रसंगी हंबीररावांनी व संताजी भोसले यांनी मराठी सैन्यास एकत्र करून मध्यरात्रीच व्यंकोजीराजांच्या तालावर हल्ला करून त्यांच्या फौजेची दणादण उडविली . प्रचंड असा खजिना,हत्ती,घोडे मराठ्यांच्या हाती लागले . व्यंकोजीराजे सुद्धा हाती लागले होते , पण महाराजांच्या बंधूस कैद कसे करावे असा विचार करून त्यांनी व्यंकोजीराजांस सोडून दिले . हे युद्ध १६ नोव्हेंबर ,१६७७ साली झाले. यानंतर हंबीररावांनी कर्नाटकातील असा वेलोरचा बुलंद कोट काबीज केला. (२२ जुलै, १६७८)


प्रधानांची बंडखोरी मोडली 

छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर अष्टप्रधान मंडळीतील काही जनांनी राजारामास गाडीवर बसविण्याचे ठरवून संभाजीराजेंचा गादीवरील हक्क नाकारला. या मंडळीतील मोरोपंत पिंगळे,आण्णाजी दत्तो,प्रल्हाद निराजी,या मंडळीना वाटले कि राजाराम हा हंबीररावांचा सख्खा भाचा असल्यामुळे,आपल्या कटात हंबीरराव सामील होतील . पण हंबीररावांनी या तिघांना कैद करून कोल्हापुरास पन्हाळा किल्ल्यावर संभाजीराजे पुढे उभे केले . कारण हंबीररावांना माहित होते कि मोघलांच्या प्रचंड अश्या सेनेशी संभाजीरावांसारखा छावाच लढू शकतो . 


पुढे संभाजीराजेंच्या राज्याभिषेकानंतर हंबीररावांनी मोघलांचे संपन्न असे बुऱ्हानपूर शहर लुटिले. मोघल इतिहासकार खाफीखान म्हणतो,’ देशोदेशीचे जिन्नस ,जडजवाहीर,सोने-नाणे,रत्ने असा लक्षावधी रुपयांचा माल बुऱ्हानपूरातील दुकानांत साठविला होता. तो सर्व मराठ्यांनी लुटला . मराठे अगदी अनपेक्षित पणे आले. शहराच्या तटबंदीच्या बाहेर बहादुर्पुरा आणि इतर सात पुरे होते. त्यांना मराठ्यांनी घेरले. विशेषत: बहादूरपुऱ्यावर ते इतक्या अनपेक्षितपणे तुटून पडले कि त्या पुऱ्यातून एक माणूस किंवा एक पैसा हलवता आला नाही.’


अनेक लढाया 

पुढे मोघल सरदार शहाबुद्दीनखान याच्याबरोबरच्या  नाशिकजवळच्या रामसेजच्या लढाईत हंबीरराव जखमी झाले (जुलै १६८२). त्यानंतर मोघल सरदार कुलीच खानबरोबर भीमा नदीच्या परिसरात लढाई(ऑक्टोबर १६८२). शहजादा आज्ज्म बरोबर पन्हाळ्याजवळ लढाई (१५ डिसेंबर १६८२ व जाने-फेब्रु १६८३)

मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई (२७ फेब्रुवारी १६८३ ) शाहबुद्दीन बरोबर रायगडच्या परिसरात लढाई (जानेवारी १६८५) . मोघली मुलखात चढाया सन १६८६) ,अश्या अनेक लढाया केल्या. या अश्या पराक्रमी सेनानीची शेवटची लढाई वाईच्या परिसरात सर्जाखान या मोघल सरदारशी झाली (डिसेंबर १६८७). उभयपक्षी निकराची लढाई होऊन सर्जखानच्या फौजेची दाणादाण होऊन ती पराभूत झाली. पण लढाईच्या काळात गर्दीमध्ये तोफेचा गोळा लागून हंबीरराव धारातीर्थी पडले . अत्यंत पराक्रमी व शूर असलेले हंबीरराव पडल्यामुळे स्वराज्याची फार मोठी हानी झाली. ऐन धामधुमीच्या काळात हंबीरराव पडल्यामुळे संभाजीराजांचा मोठा आधार नाहीसा झाला .


☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||

|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

Post a Comment

0 Comments