*बांबू रानभाजी*
पृथ्वीतलावावर सुमारे २०० दशलक्ष वर्षापासून बांबूचे अस्तित्व आहे. बांबू ही वनस्पती गवत कुळातील असून तिचे आयुष्य शंभर वर्षे आहे. महाराष्ट्रात ही वनस्पती प्रामुख्याने कोकण, पश्चिम घाट, खानदेश आणि विदर्भात आढळते. बांबू ही वनस्पती तिच्या जीवनक्रमात(जाती नुसार ३०-६० वर्षांतून) एकदाच फुले-फळे देते व नंतर जीवनयात्रा संपते, बांबू पूर्णपणे वाळून जातो. बांबूचे बहूवर्षायू सरळसोट वाढणारे उंच वृक्ष, समूहाने वाढतात. त्यांची बने किंवा बेटे तयार होतात. बांबूच्या बनाला रांझी म्हणतात. ओढ्यांच्या व नद्यांच्या काठांवर बांबू वाढतात. जगामध्ये बांबूच्या सुमारे ९० जाती आणि १५०० प्रजाती आहेत. यातील २२ जाती व १४० प्रजाती भारतात आहेत, पैकी ६० प्रजाती या लागवडीखाली आहेत. तर ५०% बांबू हा पूर्व भारतात होतो. जगात चीन हा सर्वात चांगल्या प्रतीच्या बांबूचा उत्पादन घेणारा प्रथम क्रमांकाचा देश आहे. तर चीनच्या खालोखाल भारतात बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो.
अमरावती जिल्ह्यात वडाळी येथे बांबूच्या २९ प्रजातींचे संवर्धन करण्यात आले आहे. विविध प्रजातींचे संवर्धन करण्यात देशातील डेहराडूनचा पहिला, केरळचा दुसरा क्रमांक आहे. अमरावती येथे तिसाव्या क्रमांकाचे बांबूचे संग्रहालय आहे. जगातल्या दुर्मीळ व औषधी अशा ६४ प्रजाती रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारतात उत्तर-पूर्वेकडील राज्यांत राहणारे लोक विशेषतः आदिवासी लोक बांबूच्या कोवळ्या कोंबांना आपला मुख्य आहार मानतात. विविध प्रकाचे पदार्थ सुद्धा बाबूंमध्ये शिजवतात. बांबू त्याच्या जीवनाचा मोठा आधार आहे. हल्ली काही हॉटेल मध्ये बांबूचे विविध पदार्थ व बांबू मध्ये शिजवलेले बिर्याणी सारखा प्रकार मिळू लागला आहे.
शास्त्रीय नाव: Bambusa arundinacea (Retz.)Wild
कुळ: Poaceae
स्थानिक नावे: वेळू/ वास्ते/ काष्ठी/ कळक / माणगा
इंग्रजी नाव: Bamboo, Spiny Bamboo
खाण्यायोग्य भाग: कोवळे कोंब
उपलब्धीचा काळ: जुन ते ऑगस्ट
पोषकतत्वे:
बांबू मध्ये जीवनसत्व ब कॉम्प्लेक्स - थायामीन, रिबोफ्लॅविन, नियासिन, बी-६ (पायरीडॉक्सिन) आणि पँटोथिनिक ऍसिड, पोटॅशियम, कॅल्शियम, तंतुमय पदार्थ, कमी प्रमाणात प्रथिने व फॉस्फरस आहे.
· जीवनसत्व ब हे तोंड, जीभ व डोळे यांच्या करिता आवश्यक आहे. त्वचा, हाडे, केस, रक्तपेशी, मज्जातंतू व पचनसंथा स्वस्थ ठेवते. रोग प्रतीकारक शक्ती वाढवते.
· पोटॅशिअम स्नायूचे आकुंचन होण्यासाठी आवश्यक आहे.
· कॅल्शिअम व फास्फोरस हाडे व दातांना मजबुती देते.
· तंतुमय पदार्थ पचन करण्यास मदत करते.
· प्रथिने शरीराची झीज भरून काढते.
बांबू हा क्षारयुक्त आहे. यातील तंतू आणि क्षार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.
औषधी गुणधर्म:
बांबूचे कोंब, पेर, पाने, अंकुर, फुले सर्व औषधी आहेत.
· बांबूच्या कोंबाचा शक्तीवर्धक म्हणून उपयोग आहे.
· जखमेतील किडे काढण्याकरिता बाबूंच्या कोबाचे पोटीस बांधतात
· बांबूचा कोवळा भाग श्वसन विकारावर उपयोगी आहे.
· कोवळ्या कोंबाचे लोणचे अपचनात उपयुक्त आहे. भाजीमुळे भूक व पचनशक्ती वाढते.
· कोवळे कोंब कुटून सांधेसुजीत बांधतात.
· बाळंतपणानंतर गर्भाशयाची पूर्ण शुद्धी होण्यासाठी ही भाजी बाळंतिणीला देतात.
· मासिक पाळी नियमित येणासाठी बांबूची भाजी उपयुक्त आहे.
· बांबू खोडांच्या पेऱ्यात तयार होणारे वंशलोचन हे दम्यावरील उत्तम औषध आहे. तसेच थंड, पौष्टिक आणि कामोत्तेजक म्हणून वापरतात.
पारंपारिक पदार्थ: वडे, पातळ भाजी, सुकी भाजी
बांबूच्या कोंबाचे विविध लज्जतदार पदार्थ बनविल्या जाते जसे लोणचे, सूप, वडे, भाजी. अमरावती जिल्यात बाबूंच्या कोंबापासून वडे आणि भाजी बनविल्या जाते. आपण वडे आणि दोन प्रकारच्या भाज्या बघूया.
वडे- कोंब सोलून त्यावरील साली काढून घेतात. सोललेले कोंबतील आतील कोवळा गाभा चिरून बारीक चकत्या करून घेतात. त्या चकत्या रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवतात किंवा लगेच करायचे असल्यास २०-२५ मिनटे पाण्यात मीठ टाकून उकळून घेतात. उडीद डाळ किंवा सोला साधारण ३ तास भिजून घेतात. तयार बांबूचे कोंब, भिजविलेली डाळ, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, जिरे, धने सर्व पाटा वरवंट्याने बारीक वाटून घेतात. तयार वाटणात हळद, थोडे लाल तिखट व मीठ घालून मिसळून घेतात. कढईत तेल तापवून, छोटे छोटे गोल वडे थापून तळून घेतात.
पातळ भाजी - बांबूचे कोंब चिरून रात्रभर पाण्यात ठेवतात किंवा पाण्यात २० उकळून घेतात. तयार बांबूचे कोंब पाटा वरवंट्याने बारीक वाटून घेतात. लोखंडी कढईत तेल टाकून त्यात बारीक जिरं, चिरलेला कांदा, हिरवी मिरची, ठेचलेला लसूण-अद्रक, हळद, धणेपूड, लाल तिखट टाकून फोडणी करतात. फोडणी झाल्यावर बांबूच्या कोंबाचा वाटलेला गोळा टाकून परतून घेतात. त्यात मीठ व आवश्यकतेनुसार पाणी घालतात. ५ मिनिटे खळखळून उकळी घेऊन भाजी शिजवतात. वरून थोडी कोथिंबीर टाकतात.
सुकी भाजी - बांबूचे कोंब चिरून ७- ८ तास मिठाच्या पाण्यात ठेवतात. मसूर डाळ १ तास भिजवून घेतात. बांबूचे कोंब पाण्यातून काढून निथळून घेऊन खलबत्यात बारीक कांडतात. जिरं, बारीक चिरलेला कांदा, ठेचलेला लसूण, हळद, लाल तिखट टाकून तेलावर फोडणी करतात. फोडणी मध्ये भिजवलेली मसूर डाळ व कांडलेले कोंब घालून भाजी शिजवतात. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालतात.
*********
0 Comments